Uncategorized

वाखरी येथे  स्व: सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी  धार्मिक व सामाजिक उपक्रमाने  साजरी

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

पंढरपूर- एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यातून समाजासाठी निर्माण केलेली संपत्ती, संस्कार आणि केलेली सेवा हीच त्यांची खरी श्रीमंती असते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या चरणी सेवा रुजू करण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करणे ही आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचे भावोद्गार ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख यांनी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरण निमित्त काढले.

पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, पांडुरंग परिवाराचे नेते तथा माजी आमदार श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील कर्मयोगी प्रशासकीय भवन येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचे भक्तिमय कीर्तन संपन्न झाले.

यावेळी कीर्तनातून जगन्नाथ महाराज यांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, सहकार, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.

कीर्तनादरम्यान ह.भ.प. जगनाथ महाराज देशमुख यांनी संतपरंपरा, भक्ती, नामस्मरण, सदाचार आणि समाजसेवेचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम तसेच माणसाने समाजाप्रती आपली जबाबदारी कशी पार पाडावी, याबाबत त्यांनी विविध उदाहरणांतून मार्गदर्शन केले. अभंग, भजन आणि हरिनामाच्या जयघोषामुळे कारखाना परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यावेळी सामाजिक भान जपत कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान केले.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम केले. सहकार, शिक्षण, सामाजिक कार्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.

स्व.परिचारक यांच्या स्मृतींना उजाळा देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पांडुरंग परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना..गिरीश महाजन , आ.समाधान आवताडे, आ. बाबासाहेब देशमुख, आ.अभिजित पाटील, आ. उत्तमराव जानकर, माजी मंत्री   लक्ष्मणराव ढोबळे,.मनोहरभाऊ डोंगरे,. माजी आ. दिलीपराव माने, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार रामभाऊ सातपुते शिवाजीराव काळुंगे शिवानंद पाटील, अनिल सावंत, कल्याणराव काळे,  बाळराजे पाटील, राहुल शहा, तानाजी खरात, बी. पी. रोंगे, .  संजय आवताडे,   गणेश पाटील  शशिकांत चव्हा.  विक्रम शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवरांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
दरम्यान स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळपासून धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close