Uncategorized

व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना नगराध्यक्षा,डॉ. प्रणिताताई भालके यांचे सतर्कतेचे आवाहन

उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीला पूरस्थितीची चिन्हे 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर | प्रतिनिधी:उजनी तसेच वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगिरथ भालके यांनी व्यास नारायण झोपडपट्टी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, रोख रक्कम, औषधे, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या. नदीची पाणीपातळी आणखी वाढल्यास प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचेही त्यांनी सांगितले.

नगर परिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सातत्याने समन्वय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. प्रणिताताई भालके यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close