Uncategorized

मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.समाधान आवताडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

ना.नितीन गडकरी,ना.अश्विन वैष्णव, ना.रावसाहेब दानवे यांना दिले निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

प्रतिनिधी : पंढरपूर – मंगळवेढा  पोटनिवडणुकीमध्ये परिवर्तनाची नांदी देत आवताडे हे आमदार झाले यावेळी मतदारसंघातील जनतेला विकासासाठी दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच कोणताही बडेजाव न करता कामास प्रारंभ केला. त्याचाच एक भाग म्हणून आ. समाधान आवताडे हे विकासासाठी दिल्ली दरबारी पोहचून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी व रेल्वेमंत्री ना.अश्विन वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

मंगळवेढा बाह्यवळण रस्ता सोलापूर जिल्हा प्रादेशिक विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम – १९६६ चे  कलम १५ (१) अन्वये सन २००५ साली मंजूर झालेला आहे. सोलापूर जिल्हा  प्रादेशिक विकास योजना अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद परिघस्त परिसर क्षेत्रातील मंगळवेढा – पंढरपूर राज्य महामार्गपासून ते जुना मारापूर रस्ता व अकोला रस्ता मार्गे रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग ( मंगळवेढा – सांगोला) पर्यंतच्या रस्त्यास ३० मीटरचा बाह्यवळण रुंदीचा जोडणारा रस्ता मंजूर असून त्याचे भूसंपादन करून त्वरित विकसित करावा अशी मागणी प्रत्यक्ष भेट घेऊन ना. नितीन गडकरी यांचेकडे करण्यात आली.

त्याचबरोबर मतदार संघातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी सी. आर. एफ. फंडामधून मतदारसंघातील रस्ते विकसित करण्यासाठी तब्ब्ल १४३ कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पत्र देण्यात आले. तसेच माचणूर तीर्थक्षेत्र असल्याने व तेथील भक्तांची आवक – जावक पाहता सदरील तीर्थक्षेत्र ठिकाणी राष्ट्रीय महामार्गचे काम चालू आहे. परंतु सदरील तीर्थक्षेत्र ठिकाणी ब्रिज केलेला नाही. तरी सदरील ठिकाणी जनतेची रहदारी पाहता ब्रिज होणे अत्यंत गरजेचे असलेबाबत व याच राष्ट्रीय महामार्गला मंगळवेढा बायपास येथे बोराळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला ब्रिज नसल्याने सदर रोडवरून येणाऱ्या लोकांना खूप मोठे वळण करून यावे लागते. त्यामुळे जनतेचा वेळ व दळणवळणाचे अंतर वाढत आहे. तसेच अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे. तरी माचणूर – राहाटेवाडी जोडणारा ब्रिज व मंगळवेढा बोराळे जोडणारा ब्रिज करण्याबाबत पत्र दिले.

मतदारसंघातील जनतेच्या मूलभूत विकासाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला – मंगळवेढा – सोलापूर व पंढरपूर – विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा मंजूर व्हावी व त्या अनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करून लागणारा अर्थिक निधी उपलब्ध करून लवकरात – लवकर संबंधित योजनेचे काम सुरु व्हावे अशी मागणी करणारे पत्र आ. समाधान आवताडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विन कुमार व रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे – पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. मंगळवेढा मार्गे सांगोला ते सोलापूर हे अंतर ८० की. मी. इतके असून सदर रेल्वेसेवा सुविधा मार्गी लागल्यास हेच प्रवासाचे अंतर कमीत – कमी वेळात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या रेल्वेसेवेचे मतदारसंघाच्या विकासात्मक पटलावरून खूप मोठे योगदान असणार आहे असेही आ. समाधान आवताडे यांनी नमूद केले आहे.

त्याचबरोबर भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये अनेक भाविक वर्षभरातील विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पंढरपूरला जातात. परंतु त्यांच्या या वारी प्रवासात ऊन, वारा व पाऊस अशा नैसर्गिक संकटसमयी अनेक मर्यादा येत असल्यामुळे त्यांच्या प्रवास सुविधा दृष्टीने आणि दळणवळण सुविधा सुलभ आणि सुकर व्हावी यासाठी सन २०१८ साली सादर झालेल्या रेल्वे अर्थिक अंदाजपत्रकात पंढरपूर – मंगळवेढा – विजापूर या नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिलेली होती त्यानुसार २०१८ पर्यंत सर्वे होवून त्याचे बजेट केंद्रीय रेल्वे पुणे विभाग यांनी रेल्वे प्रशासनाकडे सादर केला. सदरील सर्व्हेनुसार सदरील रेल्वे काम चालू होणे अपेक्षित होते परंतु सदरील प्रकल्प स्थगित ठेवणेबाबतचे पत्र 2018/A-1/CR/SY दिनांक 6-8-2018 नुसार मध्य रेल्वे विभाग पुणे यांना कळविण्यात आले.सदरील प्रकल्प हा कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा असून यामुळे भाविक व शेतकरी यांना दळणवळण सुविधा सुलभ होणार आहे.

तसेच व्यापार क्षेत्र विकासासाठी सांगोला – मंगळवेढा – सोलापूर या मार्गावर रेल्वेसेवा मंजूर होवून सुरु झाली तर संपूर्ण राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून नावलौकिक असलेल्या मंगळवेढा मालदांडी ज्वारीला मोठ्या बाजार पेठेत आयात – निर्यात होण्यासाठी एक शाश्वत आणि कमीवेळेत पोहचू शकणारी बाजारपेठ उपलब्ध होईल तसेच मंगळवेढा तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेला सांगोला तालुका हा डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे याही तालुक्याला सदर सेवेचा खूप मोठा फायदा होणार आहे असेही आ. समाधान आवताडे यांनी  निदर्शनास आणून दिले आहे.

अशा विविध मागण्या असणारे आणि पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी चालना देणारे पत्र आ. समाधान आवताडे यांनी ना. नितीन गडकरी, ना. अश्विन वैष्णव व ना. रावसाहेब दानवे यांना दिले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close