कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. रामदास नाईकनवरे यांची नियुक्ती.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
आटपाडी:- कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडीचे प्रभारी प्राचार्य, व अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, सहयोगी प्राध्यापक, डॉ. विजयकुमार पाटील यांची ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळंवाडी संचलित, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी — कोतोली. ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील अनुदानित महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीच्या वतीने निवड झाली. त्यामुळे त्यांच्या झालेल्या जागी श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. तानाजीराव पाटील व सचिव, मा. श्री शिवाजीराव पाटील यांनी दि. १४ जानेवारी पासून मराठी विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांची नियुक्ती केली.
डॉ. रामदास नाईकनवरे हे याच कला व विज्ञान महाविद्यालयामधील मराठी विभागामध्ये २०१० पासून सहाय्यक प्राध्यापक या पदावर कायम सेवेत कार्यरत आहेत. वैचारिक व सामाजिक चळवळींना आश्वासक करून त्यांना गती देण्यामध्ये डॉ. नाईकनवरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे . आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित असून, अनेक राष्ट्रीय चर्चासत्रां मधून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. माणदेशातील पाच लाख दुर्मिळ शाहिरी रचनांचे संकलन व संवर्धनही त्यांनी महाविद्यालयातील मराठी विभागामध्ये केले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र आंबेडकरवादी साहित्यिकांच्या वतीने आयोजित केलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. माणदेशाबरोबरच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी विविध सामाजिक विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. जीवन गौरव, आदर्श शिक्षक, आदर्श डॉ. शंकरराव खरात साहित्य लेखन, आदर्श महात्मा फुले साहित्य लेखन, साहित्य गौरव, व समाज गौरव अशा विविध २२ पुरस्कारांनी त्यांना विविध सामाजिक संस्थांनी व संघटनांनी त्यांना आजपर्यंत सन्मानित केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने त्यांना मराठी विषयाचे एम. फिल व पीएच. डी. चे मार्गदर्शक म्हणूनही मान्यता दिली आहे. नवोदित साहित्यिक व लेखकांना प्रोत्साहन देऊन साहित्यिक चळवळींना गतीमान करण्याचे ते महत्त्वाचे कार्य करत आहेत. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते.
सामाजिक चळवळीचे अभ्यासक, संशोधक, कवी, लेखक, व साक्षेपी समीक्षक आणि सामाजिक व वैचारिक प्रबोधनाच्या चळवळीमधील अभ्यासक, वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. २४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळावे . यासाठी सन २०१२–१३ पासून ते आज अखेर पर्यंत प्राचार्य, डॉ. बी. डी. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून सक्रियपणे त्यांनी लढा दिला. मुंबईच्या आझाद मैदानावर सलग सात महिने त्यांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून अत्यंत तीव्रपणे लढा दिला.
गेली तेवीस वर्षांमध्ये सन २००१–२ ते सन २००२–३ या दोन वर्षाच्या काळात प्रा. बाबुराव देशमुख (आटपाडी) यांनी या महाविद्यालयाचे पहिले प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहिले. व त्यानंतर सन २००२–३ ते सन २०२३–२४ या प्रदीर्घ २१ वर्षाच्या काळात अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, व सहयोगी प्राध्यापक, डॉ. विजयकुमार पाटील (कवठेमंकाळ) यांनी या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम पाहिले . आणि आता त्यानंतर तिसऱ्या वेळी मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रामदास नाईकनवरे (वाडी कुरोली– पंढरपूर) यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. तानाजीराव पाटील, आणि संस्थेचे सचिव मा. श्री. शिवाजीराव पाटील व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि कोतोली महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


