Uncategorized

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सीना नदीला पाणी सुटणार | आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

प्रेसनोट

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सीना नदीला पाणी सुटणार | आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

प्रतिनिधी:-सीना नदीतील पाणी प्रश्नावर माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या, जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीपर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्याला अखेर यश आले असून, सीना नदीत पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सीना नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावांतील उभी पिके धोक्यात आली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून हा प्रश्न सातत्याने लावून धरला. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे, वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याची ठाम मागणी केली.

उजनी धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर माढा तालुक्याचा हक्काचा पाणीहिस्सा सीना नदीत सोडण्यात यावा, अशी भूमिका आमदार पाटील यांनी ठामपणे मांडली. तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजना, मानेगाव उपसा सिंचन योजना आणि बोगद्यातून सीना नदीला पाणी देण्याच्या मागण्याही त्यांनी प्रभावीपणे शासनासमोर मांडल्या.

शेतकऱ्यांच्या हितासाठी गुरुवारी रिधोरे येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र, शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याने आणि सीना नदीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे हे माझे कर्तव्य आहे. टीका करणारे टीका करतील, पण मी माझ्या बळीराजासाठी प्रत्येक स्तरावर लढत राहणार आहे. आम्ही केलेला प्रत्येक पाठपुरावा आणि दिलेली प्रत्येक निवेदने जनतेसमोर पारदर्शकपणे मांडली आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.”

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीप्रमाणेच सीना नदीतही लवकरच पाणी सोडले जाईल, असा विश्वास व्यक्त करत आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांचे आभार मानले. तसेच “पंढरीचा पांडुरंग आणि आई माडेश्वरीच्या कृपेने राज्यात भरपूर पाऊस पडो, उजनी धरण शंभर टक्के भरू दे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

सीना नदीतील पाणीप्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी केलेल्या संघर्षामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close