Uncategorized

अतिक्रमण कारवाईला विरोध नाही; पण गरीबांचे संसार उद्ध्वस्त करणे अन्यायकारक : मनसे नेते दिलीप धोत्रे

मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

*पंढरपूर :-पंढरपूर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

“अतिक्रमण हटविण्याला आमचा कोणताही विरोध नाही; मात्र गरीब, लहान व्यावसायिक, फेरीवाले आणि कर्ज काढून उद्योग उभा केलेल्या तरुणांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा संतप्त सवाल मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

याप्रसंगी त्यांनी नगरपालिकेचे कायमस्वरूपी अतिक्रमण पथक असताना शहरात अतिक्रमण झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत कारवाईच्या पद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली.

यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक प्रसाद कळसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा पुरेसा वेळ न देता रस्त्याला अडथळा न येणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांवर अचानक कारवाई केली. संबंधितांना नोटीस देणे, चर्चा करणे आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, मागील काळात करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या ठरावानुसार स्थानिक फेरीवाले व लहान व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. अनेक फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी नगरपालिकेकडे आहे. अशा परिस्थितीत त्यांनाच अतिक्रमणधारक ठरवून कारवाई करणे योग्य नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाने पंढरपूर शहरात अतिक्रमण करून दुकानांमध्ये अवैध धंदे सुरू केले आहेत ते उध्वस्त करणे गरजेचे असताना स्टेशन रोडवरील सखुबाई कन्या प्रशालेजवळील झेरॉक्स, शैक्षणिक साहित्य व संगणक सेवा देणाऱ्या छोट्या दुकानांवर केलेल्या बुलडोजर कारवाईचा निषेध केला.

याप्रसंगी त्यांनी प्रशासनाने बैठक न घेता, पर्यायी जागेचा विचार न करता आणि संबंधितांना संधी न देता हुकूमशाही पद्धतीने कारवाई केली. अनेकांचे हजारो ते लाखो रुपयांचे नुकसान झाले. काहींना स्वतःचे साहित्यही काढण्याची संधी मिळाली नाही, असा आरोप केला.भविष्यात कोणतीही कारवाई करताना संबंधितांना पूर्वसूचना, पर्यायी जागा आणि पुरेसा वेळ देण्यात यावा. नियम सर्वांसाठी समान असावेत. अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही स्वतः नियमांचे पालन करावे, अशी मागणी करत स्थानिक नागरिकांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

चौकट

१)आषाढी वारीपूर्वी जागा मोकळ्या करण्यामागे प्रशासनावर धोत्रे यांनी व्यक्त केला संशय आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय हटवून बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे का, असा संशय मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला असून वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक तरुणांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांना जागा मोकळ्या करून देण्याचा प्रयत्न होत नाही ना, याची चौकशी व्हावी,” अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

२)मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी १० हजारांची मदतकारवाईमुळे उदरनिर्वाहाचे साधन बंद पडलेल्या चार व्यावसायिकांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून यामध्ये चंद्रशेखर दत्तात्रेय मिरजकर, रतन काकासाहेब काळे, सूरज ज्ञानेश्वर पेंडाल आणि कबीरकुमार कदम यांचा समावेश आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close