संसदेपर्यत महिला, वंचितांना निर्णायक आरक्षण द्या . – सादिक खाटीक
मनुस्मृती आणू पाहणांऱ्याचा धोका वेळीच परतवा. - - अॅड. शौर्या पवार .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
:-श्रीकांत कसबे
विटा दि . १८ ( प्रतिनिधी )
प्रगतीपासून कोसो दुर असणाऱ्या महिला, वंचित, उपेक्षित, मागासांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विधानपरिषद , राज्यसभेच्या सर्व जागा आणि ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंतच्या ५० टक्के जागा आरक्षित करा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव आटपाडीचे सादिक खाटीक यांनी केले आहे .
अग्रणी सोशल फौंडेशन विटा यांच्यावतीने वंचित घटक व महिलांचा, शासन प्रशासनामधील सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना, या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेचे उदघाटन सादिक खाटीक यांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रसंगी सादिक खाटीक बोलत होते . प्रमुख अतिथी म्हणून अॅड. शौर्या पवार विटा, वैशाली रायते कराड आणि अध्यक्ष म्हणून वैभव शिक्षण संस्थेतील प्रा . दत्तात्रय गायकवाड सर विटा हे उपस्थित होते .

इस्लामपूरच्या जयंत दारीद्रय निर्मूलन पॅटर्नने २००६ पासून गत १७ वर्षात शासनाच्या विविध योजनांतून वाळवा तालुक्यातील सर्व स्तरातील ५८२४५ लाभार्थ्यांना ४४ कोटी ६० लाख २९८६ रुपयांच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे . ४३१ कुटुंबांना दारीद्रय रेषेच्या वर आणण्याचे काम केले गेले आहे. हे सर्व माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या सर्वसामान्याप्रती असलेल्या आस्थेतुन घडले आहे . इस्लामपुरचा हा, जयंत दारीद्रय निमुर्लनाचा पॅटर्न देशभर राबविल्यास भारत आणखी जोमाने विकास करू शकेल . छोट्या बचतीच्या सकल्पनेतून जयंत दारिद्रय निर्मूलनाचा पॅटर्न खानापूर, आटपाडी तालुक्याबरोबर विसापूर सर्कल मधील सर्व गावांसाठी यशस्वीपणे राबवला जावू शकतो, यावर सर्वानी साकल्याने विचार करावा . असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले
सर्व प्रकारचे शिक्षण, आरोग्य सुविधा फक्त शासकीय व्यवस्थांमधूनच तेही मोफत दिले पाहीजे . शिक्षण घेऊन परदेशी जाणार्यावर बंदी घातली पाहीजे . सर्व धर्मीयांच्या धार्मीक व्यवस्थांमधला पैसा सरकारने ताब्यात घेऊन देशासाठी वापरला पाहीजे . सौरउर्जा, बांबु लागवड व बांबुवर आधारीत उद्योगांची सर्व देशभर खेड्यापाड्या मध्ये उभारणी केली पाहीजे . सावलीत बसून दोन तीन तास काम करून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांकडून जेवढा दाम तेवढ्या प्रमाणात काम करून घेतले पाहीजे . सार्वजनिक सुट्ट्यांवर मोठे निर्बंध आणले पाहीजे . सेवानिवृत्तीच्या वयापासून प्रत्येक भारतीयाला पंधरा हजार रुपये पेन्शन दिली पाहीजे . असे अनेक महत्वपूर्ण बाबींवर सादिक खाटीक यांनी शेवटी भाष्य केले .
महापुरुषांची केली जात असलेली निंदा नालस्ती, संविधान, तिरंगा ध्वज, स्वातंत्र्य दिन विरोधी वक्तव्ये करणाऱ्या देशद्रोह्यांना तुरुंगात डांबण्या ऐवजी सरकार अशांना संरक्षण देत पाठीशी घालत आहे . बहुमताच्या जोरावर मनुस्मृती समर्थकांना आवश्यक आणि बहुजनांना,संविधानाला मारक असे कायदे केले जात आहे. हुकुमशाही वृत्तीच्या या मनमानीतुन मनुस्मृतीवर आधारीत विचारधारा देशवासीयांच्या माथी थोपवण्याचा सुरू असलेला प्रयत्न सर्वांनी मोडून काढला पाहीजे. असे मत आघाडीच्या सामाजीक कार्यकर्त्या अॅड . शौर्या पवार यांनी व्यक्त करून, प्रत्येक क्षेत्रात महिला समर्थपणे, सक्षमपणे आणि लक्षवेधी काम करू शकते, हे लाखो महिलांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. महिलांच्या आत्मविश्वास आणि क्रयशक्तीला बळकटी देत, ही प्रचंड ताकद विकास, परिवर्तनासाठी उपयोगात आणली पाहीजे . असेही अॅड शौर्या पवार यांनी म्हंटले आहे .
आपण थोरा मोठ्यां सारखे जरी बनु शकत नसलो तरी चालेल . एक वेळ चांगले करता आले नाही तर चालेल पण कोणाचे वाईट करू नका . आप आपसातील मत्सरामुळेच महिला स्वतः , स्वतः च्या प्रगतीत अडसर ठरत आहेत . प्रत्येक सासूने प्रत्येक सुनेत स्वतःची मुलगी पाहिल्यास कोट्यावधी कुटूंबे सुखी, संपन्न, समाधानी होतील . प्रचंड कार्यक्षमता असणाऱ्या महिला, भीती, लाजराबुजरा स्वभाव, नकारार्थी न्यूनगंड यामुळे मागास,दिशाहीन जरी वाटत असल्या तरी त्यांच्यातील आत्मविश्वास आणि स्वतःजवळच्या प्रचंड कर्तृत्वाच्या अदृश्य कस्तुरीची त्यांना जाणीव करून दिल्यास, त्यांना प्रोत्साहन, पाठबळ दिल्यास नेत्रदीपक कार्यातून त्या स्वतःचे कुटूंब, समाज, राज्य, देश, एवढेच नव्हे तर विश्वाची स्थिती बदलून टाकतील. असे गौरवोदगार प्रा . दत्ता गायकवाड सर यांनी काढले .
यावेळी विंग प्रोसेस कराडच्या वैशाली रायते यांनी सखोल मार्गदर्शन केले . स्वागत सुहासिनी शिंदे विटा यांनी तर प्रास्तावीक करीना मुल्ला नेवरी यांनी केले . संस्थेची माहीती उपक्रम इत्यादीबाबत पाकीजा शिकलगार चिकलहोळ, शोभाताई लोंढे, पुनम चंदनशिवे लेंगरे यांनी माहिती दिली . अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीर शिकलगार सुलतानगादे , संस्थापक आप्पासाहेब माने मानेवाडी, विशाल भिंगारदिवे कार्वे ( विटा ) सागर माने आळसंद, मनिषा गुजले लेंगरे, देवकुमार दुपटे, दीपक पवार, बलवडी ( भाळवणी ), शुभांगी भोसले नेलकरंजी, रेवणसिद्ध कांबळे, चंद्रशेखर गायकवाड, बालाजी गायकवाड विटा, सदाशिव देवकर, समीर मुल्ला आळसंद, असिफ उर्फ बाबु खाटीक, बाळासाहेब उर्फ सलीम वंजारी, नदिम खाटीक आटपाडी, साहेबराव कदम गोमेवाडी, सुनिता गडदरे विटा, रीटा माने खरसुंडी, दादासाहेब वाक्से वाक्षेवाडी, विश्वजीत सरगर तळेवाडी इत्यादी अनेक महत्वपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते . शेवटी सुहासिनी शिंदे यांनी आभार मानले


