पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेला प्राधान्य: जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर दि. 15:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे , उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, , जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधधिक्षक डॉ. सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक प्रविणकुमार घम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, पालखी सोहळा आणि सर्व भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. यासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी आवश्यक तात्काळ पाहणी करुन रस्ते दुरुस्ती बाबतची कार्यवाही करावी. पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा याठिकाणी भाविकांना पुरेशा शौचालय सुविधा व मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ व आवश्यक यंत्रणाची उपलब्धतेबाबत नियोजन करावे. अन्न औषध प्रशानाने पालखी मार्गावरील तसेच शहरातील व परिसरातील खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करावी. तसेच पदार्थांची तपासणी करुन तात्काळ अवहाल प्राप्तीसाठी फुड सेफ्टी ऑन व्हील या मोबाईल व्हॅनची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच भेसळ व विषबाधा होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करावे.
तसेच सुरक्षेसाठी वाखरी, भक्ती सागर (65 एकर) , वाळवंट, दर्शन मंडप, दर्शन रांग, मंदीर व परिसर, प्रमुख रस्ते ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करुन एकाच ठिकाणी ऑपरेटींग सिस्टीम करण्याबात नियोजन करावे. वारी कालावधीत खाजगी हॉस्पिटलचे दहा टक्के बेड रिकामे ठेवण्याबात आरोग्य विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आषाढी यात्रेत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे दिली यामध्ये पालखी सोहळे येण्याचे मार्ग मुक्कामाचे व विसाव्याचे ठिकाण व त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबतची माहिती दिली. तसेच वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर) वाळवंट, दर्शन रांग, दर्शन मंडप येथे प्रशासन व मंदिर समितीकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
0000000000




