वैयक्तिक लायकी मिळविण्या ऐवजी सामाजिक लायकी मिळविण्यासाठी प्रयत्न करा -नरसिंग घोडके
लसाकमच्या कार्यकर्त्यांना केले आवहान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर — मनुवादी समाजव्यवस्थेने भारतातील दलित – आदिवांसींना गुलाम करून त्यांचे शोषण केले. त्यांच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या. परंतु फुले -शाहू -आंबेडकरांनी प्रचंड संघर्ष करून त्यांची शोषणातून मुक्तता केली . त्यामुळे आजची शिक्षित पिढी कांहीअंशी स्वाभिमानाने जीवन जगते आहे. याचे भान ठेवून फुले -आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी असलेल्या शिक्षित आणि स्वाभिमानी लोकांनी वैयक्तिक पात्रता मिळविण्यात गुरफटून राहाण्याऐवजी व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हावे. त्यातून मिळणारी सामाजिक लायकी हीच खऱ्या जीवनाची सार्थकता होय. अशी पात्रता मिळविण्यासाठी ‘ लसाकम ‘ च्या कार्यकर्त्यानी प्रयत्न करावेत असे अवाहन ‘ लसाकम ‘ चे राज्यनियंत्रक नरसिंग घोडके यांनी केले आहे.
लातूर येथील प्रकाशनगरमधील ‘ प्रबोधन ‘ सदन मध्ये लातूर जिल्ह्यातील ‘ लसाकम ‘ च्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक नरसिंग घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नरसिंग घोडके बोलत होते. बैठकीच्या सुरूवातीस ‘ लसाकम ‘ चे दिवंगत जिल्हाध्यक्ष विलास जाधव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी एकनाथ पलमटे यांची नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मधुकर दुवे यांची जिल्हासचिवपदी पुनरनियुक्ती करण्यात आली. या उभयतांचे पुष्पाहार घालून अभिनंदन करून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. या पदाचा आणि अभिनंदनाचा स्वीकार करताना सर्वांना सोबत घेऊन आंबेडकरी विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ‘ लसाकम ‘ ची चळवळ अधिक गतीमान करण्यासाठी तन -मन-धनाने कार्य करू असे आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष एकनाथ पलमटे आणि सचिव मधुकर दुवे यांनी दिले.


