महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर”: ॲड. राहुल नार्वेकर
युवा पिढी विकसित भारताचा पाया : नार्वेकर


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर, दि. 21 : आजचा युवक तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे जात आहे. युवा पिढी हाच विकसित भारताचा पाया आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन त्याचा योग्य वापर केला, तर केवळ आपले राज्यच नाही तर देशाचीही प्रगती होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या काळात महाराष्ट्र “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर” बनणार आहे. जगातील अनेक देशांचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम महाराष्ट्र करेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी महाविद्यालयात “ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राची निर्मिती” या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, विधानसभा सल्लागार ॲड. संदीप केकाणे, महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, “पंढरपूर ही श्रद्धेची, ज्ञानाची आणि शेतीची भूमी आहे. याच पंढरपुरात आता तंत्रज्ञानाची नवी पिढी घडत आहे. तंत्रज्ञानाच्या बळावरच भारताने चंद्रावर झेप घेतली आहे. देशात महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली आहे.
एआयमुळे जीवन जितके सोपे झाले आहे, तितकेच पुढील काळात टिकून राहण्यासाठी एआय आत्मसात करणे गरजेचे आहे. एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. नव-नवीन तंत्रज्ञान येत आहे. भारताच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत आणि त्या तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण करणे अशक्य आहे. कोणताही देश यशस्वी करायचा असेल तर सरकारसोबत लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. लोकशाहीत संविधानिक पद्धतीने विचार व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. विरोध करा, पण तो संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार असावा.”कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाबाबत माहिती जाणून घेतली.
युवा शक्ती देशाचा आधारस्तंभ : आमदार आवताडे
यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, “ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीचा योग्य ताळमेळ झाला तर जगाच्या इतिहासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल. तंत्रज्ञानाच्या जोरावर राज्याची प्रगती झाली आहे. युवा शक्ती हा देशाचा आधारस्तंभ आहे. विद्यार्थी हा देशाचा आणि राज्याच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. नालंदा विद्यापीठ आज जिवंत असते तर भारत जगात प्रथम क्रमांकावर राहिला असता. ज्ञान, तंत्रज्ञान आणि युवाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र जगात अग्रेसर बनेल.
याप्रसंगी स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी सांगून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची आणि महाविद्यालयात संशोधनासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
0000000000




