पुरोगामी संघर्ष परिषदेचे करमाळा तहसीलवर लाक्षणिक उपोषण; महिलांच्या प्रश्नांवर रणशिंग फुंकले!


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
करमाळा (प्रतिनिधी):महिलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि शासनाच्या धोरणांविरुद्ध आज करमाळा तहसील कार्यालयासमोर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार आणि महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा डॉ. सुनीता खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख (महिला आघाडी) कोमल साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.त्यामध्ये
खालील प्रमुख मागण्या मांडल्या
१. लाडकी बहीण योजना: या योजनेचे तातडीने कायद्यात रूपांतर करून दर सहा महिन्याला महागाईनुसार मानधनात वाढ करावी.
२. रेशन कार्ड समस्या: रेशन कार्डला नंबर देऊन ते ऑनलाईन दिसेल अशी व्यवस्था करावी आणि रेशनवर तत्काळ धान्य वितरण सुरू करावे.
३. महिला सक्षमीकरण: महिलांना स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी विना जामीनदार आणि विना व्याज १० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.
४. कर्जमाफी: खाजगी फायनान्स कंपन्यांची जाचक वसुली थांबवून त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करावे.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संगीता पांढरे, ग्रामीण तालुकाध्यक्ष (करमाळा) प्रियांका गरड, करमाळा तालुकाध्यक्ष मंगला दामले, तसेच शितल शिंदे, अश्विनी पाटील, नलिनी कदम यांच्यासह पुरोगामी संघर्ष परिषदेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
“आजचे हे उपोषण केवळ लाक्षणिक आहे. जर प्रशासनाने येत्या १५ दिवसांत आमच्या या रास्त मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही ‘आमरण उपोषणाला’ बसू,” असा खणखणीत इशारा कोमल साळवे यांनी यावेळी दिला.
निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी ‘जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.


