सुधीर गवळी एक सत्यशोधकीय व्यक्तिमत्त्व. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड
सुधीर गवळी यांना वऱ्हाड विकास व कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार प्रदान

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
अमरावती ( प्रतिनिधी )” सध्याच्या स्थितीत धर्मांध शक्तींना खतपाणी घातले जात आहे.अशा वेळी सुधीर प्रकाशनाच्या माध्यमातून सुधीर गवळी हे गेल्या चार दशकापासून फुले-शाहू- आंबेडकरांचे सत्यशोधकीय विचार गतिशील करीत आहेत. त्यांचे प्रकाशन क्षेत्रातील कार्य वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.या सत्यशोधकीय व्यक्तिमत्त्वाने फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित अनेक पुस्तकं प्रकाशित करून सत्यशोधकीय विचारांचा प्रचार व प्रसार केलेला.”असे विचार समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.
ते वऱ्हाड विकास व कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे वर्धा येथे नुकताच संपन्न झालेल्या समाजसेवी सुधीर गवळी यांना दिलेल्या महात्मा फुले
राज्यस्तरीय सत्याशोधक पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख अतिथी वसंतराव भडके (माजी लेखाधिकारी), उत्कर्ष गवळी,विनय डहाके, माळी महासंघाचे अध्यक्ष सुधाकर मेहरे,वासुदेवराव कडूकर, निळकंठराव राऊत, अशोकराव कडू,संजय भगत,भरत चौधरी, मोहन पोहनकर,विशाल हजारे,कोठेकर,रोहिणी पाटील,किरण कडू होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महात्मा फुले,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण झाले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना समाजसेवी सुधीर गवळी यांनी ,” सत्यशोधक पुरस्कार” बहाल केल्याबद्दल वऱ्हाड विकासचे व कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले यांचे आभार मानले.पुरोगामी चळवळ वृद्धिंगत करण्याचे कार्य प्रा.श्रीकृष्ण बनसोड करीत असल्याचे प्रतिपादन केले.”
समाजसेवी सुधीर गवळी यांनी फुले-शाहू -आंबेडकर-विचारधारेवर आधारित 475 पुस्तक व संदर्भ ग्रंथ प्रकाशित केली आहेत. पहिल्या पिढीत त्यांचे वडील शालिग्राम गवळी यांनी फुले-शाहू -आंबेडकरांच्या विचारांची पुस्तके घरोघरी देऊन पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार केला.वर्धा येथील बोरगाव मेघे येथून त्यांनी फुले -शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुस्तक प्रकाशनातून संपूर्ण भारतभर आजपर्यंत केलेला आहे व करीत आहेत.प्रकाशनाच्या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सुधीर गवळी यांना सन्मानित केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव भडके,संचालन उत्कर्ष गवळी तर आभार अशोक कडू यांनी मानले.