मातंग समाज अन्याय अत्याचार दोषीवर कठोर कारवाई करावी.. क्रांतिगुरु लहुजी महासंघाची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
नगर(प्रतिनिधी):सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातीलय बोरगाव याठिकाणी मागासवर्गीय मातंग समाजातील मृत व्यक्तीच्या प्रेताला स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास विरोध करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ क्रांतिगुरु लहुजी महासंघ सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर,येथे निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील बोरगाव याठिकाणी मागासवर्गीय मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांचे बंधु धनाजी साठे यांचे निधन झाले असता गावातील जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकानी त्यांचा सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला त्यामुळे प्रेताची जाणूनबुजून विटंबना करून अत्यंत संतापजनक मानवतेला कलंकित करणारी घटना घडली. या प्रकरणातील गुंड प्रवृत्ती चे समाजकंटक आरोपी तसेच संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष करून अन्याय ग्रस्तांवर दबाव आणणारे स्थानिक अधिकारी यांना देखील सह आरोपी करून त्यांच्या वर व संबंधित गावगुंड समाजकंटकावर अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,साठे कुटुंबाचे पुनर्वसन करावे, सदरील कुटुंब भयभीत असून त्यांना संरक्षण द्यावे, फिर्यादीचा पुरवणी जबाब घेण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला.यावेळी क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे राज्यसंपर्क प्रमुख सचिन नवगिरे, जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे, रामदास साळवे,हरिभाऊ साळवे,मीनाताई नेटके,बाळू नेटके,गणेश राजहंस,अविनाश उमाप, अमोल साळवे,अनिल वैराळ, मारुती वैराळ आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सचिन नवगिरे म्हणाले की,सदर घटना सूडाच्या भावनेतून घडली असुन आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी सदर मागणीची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला .


