Uncategorized

इंडिया व भारत यांमधील दरी कमी करणे गरजेचे – सोबसचे मुख्याधिकारी दिग्विजय चौधरी

स्वेरीत एकदिवशीय ‘स्टेकहोल्डर्स मीट’ संपन्न

छायाचित्र- स्वेरी मध्ये सोबस इन्साईटस् फोरम च्या वतीने आयोजिलेल्या ‘स्टेकहोल्डर्स मीट’चे उदघाटन करताना सोबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी, गिरीष संपत, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, कृषिरत्न बालाजी लोहकरे, रिशा पटेल आदी

जो।।शाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

पंढरपूर: ‘पाणी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, रोजगार निर्मिती व स्वयंपूर्ण शेती या क्षेत्रातील समस्यांचा शोध घेऊन त्या संदर्भात तज्ञांची मदत घेवून विकास साधणे गरजेचे आहे. समाज व पर्यावरण यांची सांगड घालून निर्माण करण्यात आलेला बिझनेस म्हणजे ‘सोबस’ होय. या व्याख्येनुसार पाहिल्यास असे लक्षात येते की जर या दोन बाबींमध्ये ताळमेळ नसेल तर समाजाचा आपण विकास साध्य करू शकणार नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, योग्य मार्गदर्शन घेवून आपण अवघड कार्य सोपे करू शकतो. केवळ पोकळ भाषणे देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. काम, संकल्पना, योग्य उद्योग, कौशल्य, बुद्धीमत्ता, संकल्पना, आपसातील संबंध , संभाषण, करार या गोष्टींची सांगड घालणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उद्योग धंद्यात मार्गदर्शन आणि धाडस या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि हे सर्व एकत्र साध्य करण्यासाठी सर्वप्रथम ‘इंडिया व भारत’ यांमधील दरी कमी करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन सोबसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी यांनी केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व युवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये ‘उद्योजक, शेतकरी, पालक, माजी विद्यार्थी, कंत्राटदार, व्यावसायिक आणि शिक्षकवृंद’ यांच्यासाठी सोमवार, दि. ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी एकदिवशीय ‘स्टेकहोल्डर्स मीट’चे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत विविध सत्रांत विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. दीपप्रज्वलनानंतर शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी प्रास्तविकात माहिती देताना म्हणाले की, ‘स्वेरीतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना उद्योजकता या क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी स्वेरीचा सोबस सोबत सामंजस्य करार झाला असून संशोधनाच्या दृष्टीने हा करार महत्वाचा ठरत आहे. सामंजस्य करार केल्यानंतर छोट्या छोट्या गावातील विद्यार्थ्यांचे सशक्तीकरण करण्याचे काम केले. त्यानंतर येथील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे येथील उद्योजकतेसाठी पाठवले. आपली मुले-मुली हे पुणे, मुंबई येथे न जाता येथे गावातच राहून छोटे- मोठे उद्योग उभे करण्यासाठी सल्लामसलत करण्यात आली. तज्ञ संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली तरुण अभियंते जगाला जोडण्याचे कार्य करताना वेळ, संकल्पना, निधी या माध्यमातून सोबस बरोबर जोडले गेले आहेत’ असे सांगून स्वेरीतील संशोधन विभागाची यशस्वी वाटचाल व मिळालेला निधी सांगून आजच्या ‘स्टेकहोल्डर्स मीट’चे संपूर्ण स्वरूप सांगितले. पुढे बोलताना ‘सोबस इन्साईटस् फोरम’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी म्हणाले कि, ‘स्वेरीतील प्राध्यापकांचा संशोधनातील अनुभव विचारात घेवून व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘स्वेरी’ अविरत कार्य करत असल्याचे पाहून ‘सोबस’ने संस्थेबरोबर सामंजस्य करार केला असून पंढरपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस चालना मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नसते तर केवळ प्रोत्साहन आणि आत्मविश्वासाची गरज असते. फार पूर्वीपासून मी स्वेरीची वाटचाल पाहत आलेलो आहे. या कराराच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासास नक्कीच हातभार लागणार आहे.’ पश्चिम भारत चॅप्टरचे चेअरमन महेश वैद्य व आयआयटी खरगपूर येथून इंद्रजीत चटर्जी यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन करताना ‘समाजासाठी काहीतरी विकासात्मक योगदान देण्याची इच्छा’ व्यक्त केली. तंत्रज्ञानातुन समाजातील समस्या सोडवण्यासाठी मदत व ‘स्वयंपूर्ण खेडे’ हे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे असे सांगितले. यानंतर माऊली आटकळे, निखिल शहा, अभिजीत भोसले, शार्दुल नलबिलवार, कृषिरत्न बालाजी लोहकरे, तुकाराम यादव, पद्माकर भोसले, आकाश इंगळे, अनिल रेपाळ, जावेद शेख, मधुरा लाड, अंकुश बेडगे यांनीही यावेळी आपले विचार स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात उद्योजकता व व्यवसाय या संदर्भात चर्चा होऊन त्यातून आव्हाने वाटतात अशा समस्या प्रथम सोडवाव्यात’ असे प्रतिपादन राज डूबल यांनी केले. या एकदिवशीय कार्यशाळेत आकाश इंगळे, योगेश बोराटे, प्रविण लाड, रोहित गायकवाड, लखन माने, रोहित सुरवसे या शेतकरी, उद्योजकांनी चर्चात्मक कार्यात सहभाग घेतला. स्वेरीने या चर्चासत्राचे उत्तम नियोजन केले होते. यावेळी सोबसच्या संचालिका रिशा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, स्वस्तिका स्वेन, ईशान पंत, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, प्राध्यापक वर्ग व आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close