Uncategorized

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार,  तीन संवर्गात एकूण 15 हजार 511 पदे भरण्यात येणार             

एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतीमान करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

मुंबई, दि. 5 :- ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील आहे. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता

– उपमुख्यमंत्री अजित पवार

·       तीन संवर्गात एकूण 15 हजार 511 पदे भरण्यात येणार

            मुंबईदि. 6 : सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्यशासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.

            कालच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आज विधानसभेत केलेल्या निवेदनात श्री. पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांबाबतचे ठोस निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आले असल्याचे सांगितले.

            ज्या विभागांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे अशा विभागांना रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार गट अ मध्ये 4 हजार 417, गट ब मध्ये 8 हजार 031 आणि गट क मध्ये 3 हजार 063 अशी एकूण 15 हजार 511 अशी तीन संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही श्री. पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close